जयपूर हे राजस्थानची राजधानी आहे. जयपूरला 'गुलाबी शहर' म्हणुनही ओळखले जाते. जयपूर पूर्वीच्या संस्थानाचेही राजधानीचे ठिकाण होते. या शहराची स्थापना इ.स. १७२८ मध्ये दुसऱ्या महाराजा जयसिंह यांनी केली. येथील लोकसंख्या इ.स. २००३ मध्ये जवळजवळ २७ लाख होती.
जयपूर शहर येथील महाल आणि जुन्या घरांसाठी वापरलेल्या गुलाबी दगडांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्ण शहर सहा भागांत १११ फुटी रस्त्यांनी विभागले आहे.
जयपूरला आधुनिक शहरी योजनाकार सर्वात नियोजित आणि व्यवस्थित शहरांमध्ये गणतात. एकोणविसाव्या शतकात जयपूर शहराचा विस्तार सुरू झाला. त्यावेळी त्याची लोकसंख्या १,६०,००० होती. येथील मुख्य उद्योग धातुकाम, संगमरमर, वस्त्र-छपाई इत्यादी आहेत. जयपूरमध्ये सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवामहल, अंबर महाल, मुबारक महल, जलमहल, इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. जयपूर हे भारतातील सर्व सुंदर शहरांतले एक आहे. भारताच्या पर्यटनातील सुवर्ण त्रिकोणात (जयपूर-आग्रा-दिल्ली) जयपूर शहर मोडते. जयपूर हे शहर महाराजा सवाई जयसिंह-२ यांनी स्थापन केले. त्यांनी १६९९ ते १७४४ पर्यंत राज्य केले तेव्हा त्यांची राजधानी अंबर होती. अंबर हे शहर आजच्या जयपूरपासून ११ किलोमीटरवर आहे.